संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल   

पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन 

पुणे : आदिवासी समाजासंदर्भातील संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी समाज, त्यांची संस्कृती टिकण्यासाठी मदत होईल, असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. विद्यापीठांमधील भाषा विभाग, ललित कला केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
बहुरंग, पुणेतर्फे दोन दिवसीय १८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंडित विद्यासागर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, आदिवासी संस्कृती अभ्यासक ग. श. पंडित उपस्थित होते. माडीया गोंड लोक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेले ‘शीरमोर’ हे यंदाच्या महोत्सवाचे बोधचिन्ह आहे. राज्य शासनाअंतर्गत असलेला सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पंडित विद्यासागर म्हणाले, विस्थापन, मुलभूत सुविधा, आर्थिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण हे आदिवासी समाजासमोरील मुख्य प्रश्न आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याविषयी दोन प्रवाह आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्यास त्यांची संस्कृती कशी टिकणार, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात न आणल्यास त्यांचा विकास कसा साधणार असे प्रश्न उपस्थित केले जातात. आदिवासी प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात. 
 
आदिवासी समाजाची ओळख पुसण्याचाच प्रयत्न आहे. डॉ. कुंडलिक केदारी, ग. श. पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. धीरज केदारी यांनी आभार मानले. 

Related Articles